Latur Kalyan Expressway : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे नुकतेच संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाचे आणि विकासाभिमुख निर्णय घेण्यात आले. याच अधिवेशनात लातूर–कल्याण महामार्ग प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत नवे अपडेट समोर येत आहे.
मुंबई ते मराठवाडा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून नव्या एक्सप्रेसवेच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण–लातूर ‘जनकल्याण’ द्रुतगती महामार्ग हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून मराठवाड्याच्या एकात्मिक विकासासाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारकडून तत्वतः मान्यता, संरेखनाचे काम सुरू. Latur Kalyan Expressway
राज्य सरकारकडून तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर एमएसआरडीसीने या महामार्गाच्या संरेखन (Alignment) कामाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता, मात्र फक्त कागदावरच अडकून पडला होता. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचे सादरीकरण पाहून तातडीने प्रकल्प मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर विधानसभेत या महामार्गाची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे आता प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग? Latur Kalyan Expressway
एमएसआरडीसी राज्यात सुमारे ४ हजार किलोमीटर लांबीचे नवीन महामार्ग विकसित करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये कल्याण–लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या प्राथमिक संरेखनानुसार हा महामार्ग खालील ६ जिल्ह्यांतून जाण्याची शक्यता आहे –
- ठाणे
- पुणे
- अहिल्यानगर
- बीड
- धाराशीव
- लातूर
प्राथमिक माहितीनुसार संभाव्य मार्ग असा असू शकतो –
उल्हासनगर – मुरबाड – जुन्नर – अहिल्यानगर – आष्टी – पाटोदा – बीड – केज – कळंब – लातूर – औसा – निलंगा
मात्र, अंतिम संरेखन जाहीर झाल्यानंतरच या मार्गाबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.
बीड आणि धाराशीव जिल्ह्यावरून राजकीय हालचाली
दरम्यान, हा महामार्ग धाराशीव जिल्ह्यातून जावा, यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. धाराशीवचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा महामार्ग धाराशीव व बीड जिल्ह्यांतूनच न्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दुसरीकडे, बीड जिल्ह्याला वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या रूटवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
MSRDC चा खुलासा
एमएसआरडीसीने मात्र स्पष्ट भूमिका मांडली असून, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य ठरणारे संरेखनच अंतिम केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. मंत्र्यांकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर हा महामार्ग बीड आणि धाराशीव जिल्ह्यातील काही तालुक्यांतून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंतिम निर्णय लवकरच. Latur Kalyan Expressway
संरेखनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या महामार्गाचा अंतिम रूट, जिल्हे आणि तालुक्यांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. कल्याण–लातूर द्रुतगती महामार्गामुळे मराठवाडा आणि मुंबई-पुणे विभागातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून उद्योग, व्यापार आणि रोजगाराला चालना मिळणार आहे.





